राजस्थानच्या जयपूर हायकोर्टाच्या आवारातील मनूच्या पुतळ्याला काळे फासल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- खरात गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले असून भाजपा- संघ मुक्त अभियानाची ही सुरुवात असल्याची प्रतिक्रिया खरात गटाच्या नेत्यांनी दिली आहे. जयपूर हायकोर्टाच्या आवारात मनूचा पुतळा असून हा पुतळा हटवण्याची मागणी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- खरात गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जयपूरमध्ये मनूच्या पुतळ्याला काळे फासले. एक महिला पुतळ्याला काळे फासतानाचा व्हिडिओ समोर आला असून संबंधित महिला ही खरात गटाशी संबंधित असल्याचे वृत्त आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुक्त भारत अभियानाची ही सुरुवात आहे. आमच्यासाठी हे भारत स्वच्छता अभियान असून आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या कृतीचा आम्हाला अभिमान आहे, असे खरात गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. मनूने हिंदू महिला, दलित महिला या गुलाम असल्याचे म्हटले होते. याचा या महिलांनी निषेध केला, असे त्यांनी सांगितले. हा पुतळा हटवावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असे पक्षाने म्हटले आहे. मात्र, एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही महिला बिहारच्या औरंगाबादच्या रहिवासी आहेत. त्यामुळे नेमकं काळे कोणी फासले, याबाबत संभ्रम आहे. या घटनेनंतर हायकोर्टातील वकीलही आक्रमक झाले आहेत. वकिलांनी घोषणाबाजी केल्याने शेवटी पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेतले.