सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी वर्षाच्या अखेरच्या दिवशी स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केली. जयललिता यांच्या मृत्यूनंतर रजनीकांतसारख्या सुपरस्टारने राजकारणात प्रवेश कऱणे महत्त्वाचे मानले जात आहे. माझा पक्ष तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणूक लढवेल असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. आपण वेगळा पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली असली तरीही त्यांनी अद्याप आपल्या पक्षाचे नाव मात्र गुलदस्त्यातच ठेवले आहे. त्यांच्या या राजकारणातील प्रवेशानंतर तामिळनाडूतील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे. त्यांच्या राजकारणातील या प्रवेशानंतर राजकीय आणि चित्रपटसृष्टीतील अनेकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. तामिळनाडूचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष तमिलिसे सौदरराजन यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी रजनीकांत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पाठींबा देणार असल्याचे म्हटले आहे.

तर रजनीकांत यांनी, माझा राजकारणातील प्रवेश ही काळाची गरज होती. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत स्वतंत्र पक्ष स्थापन करून तामिळनाडू विधानसभेच्या सर्व २३४ जागा लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सध्या राज्यातील लोकशाहीची अवस्था अत्यंत वाईट आहे. देशातील इतर राज्यातील लोक ही परिस्थिती पाहून तामिळनाडूची थट्टा करतात. त्यामुळे मी इतके दिवस राजकारणात का आलो नाही, याची खंत आता मला वाटत आहे. सध्याचे राजकारणी लोकशाहीच्या नावाखाली आपले पैसे आणि जमीन बळकावत आहेत. आपल्याला तामिळनाडूतील ही सगळी व्यवस्था बदलायची आहे. त्यामुळे प्रामाणिकपणा, काम आणि विकास या तीन गोष्टी आपल्या पक्षाचा मंत्र असेल असे आपल्या सभेत सांगितले.

आपला पक्ष जर निवडून आला तर जनतेला दिलेली सगळी आश्वासने आपण पूर्ण करु असेही रजनीकांत यांनी यावेळी स्पष्ट केले. निवडणूक लढविल्यास मला जनतेचा १०० टक्के पाठिंबा मिळेल, याची खात्री असल्याचे ते म्हणाले. आणि असे नाही झाले तर आपण राजीनामा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलेतामिळनाडूमध्ये पुढील विधानसभा निवडणूक २०२१ मध्ये होणार आहे. त्यावेळी सर्व २३४ जागांवर आपण उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.