देशाचे माजी पतंप्रधान राजीव गांधी यांची मे १९९१ मध्ये एका आत्मघाती हल्ल्याद्वारे हत्या घडवून आणण्यात आली होती. मात्र, हत्येपूर्वीच याबाबत पूर्वसूचना मिळाली होती. मात्र, व्होट बँक राखण्यासाठी तत्कालीन तामिळनाडू सरकारने याकडे दुर्लक्ष केलं होतं, असा दावा माजी आयपीएस अधिकाऱ्याने केला आहे.

राजीव गांधी हत्या प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी अमोद कंठ यांनी ‘खाकी इन डस्ट स्टॉर्म’ नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकातून त्यांनी दावा केला की, लिबरेशन ऑफ टाइगर्स आणि तमिळ इलम (एलटीटीई) बद्दल सहानुभूती बाळगणाऱ्यांनी तामिळ मतदारांच्या समाधानासाठी या पुराव्यांकडे दुर्लक्ष केलं. राजीव गांधींच्या हत्येपूर्वी एक वर्षापूर्वी सर्व पुरावे मिळाले होते. एलटीटीई मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. राजीव गांधी आणि श्रीलंकन तामिळ नेत्यांची १२ सहकाऱ्यांसह १५ जून १९९० मध्ये हत्या झाली होती. विशेष हे आहे की, राजीव गांधी आणि तामिळ नेत्याच्या हत्येमध्ये एकच पद्धत वापरली होती. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली होती. मात्र, याप्रकरणी काहीही केलं गेलं नाही.

कंठ यांनी म्हटलं की, “राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीनं केला नाही. १९९१ लोकसभा निवडणुकीदरम्यान तामिळ मतदारांना डोळ्यासमोर ठेवून या प्रकरणाच्या तपासाकडे दुर्लक्ष केलं गेलं. पद्मनाभ हत्याकांड प्रकरणावेळी तामिळनाडूत डीएमकेचं सरकार होतं. त्यानंतर जानेवारी १९९१ नंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

डीएमकेचे खासदार आणि प्रवक्ते टीकेएस एलनगोवन यांनी कंठ यांचा दावा फेटाळून लावताना म्हटलं की, “आम्ही राजीव गांधी सरकारवर १३ वी घटनादुरुस्ती लागू करण्यासाठी दबाव टाकला होता. जेव्हा भारताचं शांतता पथक श्रीलंकेत पाठवण्यात आलं तेव्हा तिथं तामिळींच्या हत्या करण्यात येत होत्या. तामिळींवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात आमचे नेते करुणानिधी यांनी राजीव गांधींचे स्वागत करण्यास नकार दिला होता.”

पद्मनाभ यांच्या हत्येनंतर कट्टरवादी श्रीलंकेत पळून गेले होते आणि राजीव गांधी यांच्या हत्येपूर्वी १९९१ मध्ये तामिळनाडूत परतले होते. राजीव गांधी यांची हत्या घडवून आणणारी धनू ही त्यांच्यासोबत तामिळनाडूत आली होती. त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी हत्या करणाऱ्यांची ओळख पटवली होती. यावरुन हे सिद्ध झालं की, तामिळनाडू पोलीस मोठ्या कालावधीपासून राज्यात होत असलेला हिंसाचार पाहून शांत राहिली होती. ज्या हिंसाचारामागे एलटीटीईचा हात होता.

या पुस्तकात म्हटलंय की, एलटीटीईला भीती होती की जर राजीव गांधी १९९१मध्ये पुन्हा पंतप्रधान बनले तर श्रीलंकन सरकारला पाठिंबा देतील. केवळ या भीतीपोटी एलटीटीईने देशाच्या पंतप्रधानाच्या हत्येचा कट रचला होता.