काश्मिरच्या खोऱ्यामध्ये लष्करावर दगडफेक करणाऱ्या अल्पवयीन मुलांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केले आहे. राजनाथ सिंह सध्या दोन दिवसांच्या जम्मू काश्मिरच्या दौऱ्यावर आहेत. श्रीनगरमध्ये स्पोर्ट्स कॉनक्लेव्हमध्ये बोलताना राजनाथ म्हणाले की खेळ तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकतील. मुलांना चुकीच्या वाटेवर नेणं सोपं असतं, आणि हे सत्य आम्हाला माहित असल्यामुळेच अल्पवयीन मुलांविरोधातील दगडफेकीसंदर्भात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे ते म्हणाले.

या प्रसंगी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती उपस्थित होत्या. “जम्मू व काश्मिरमधल्या मुलांनाही देशातल्या अन्य राज्यांप्रमाणे त्यांना विविध संधी आणि चांगले वातावरण मिळायला हवं. ते झालं तर दगडफेकीच्या घटना, बाँबस्फोट व गोळीबाराच्या घटना थांबतील व मुलांना विकासाची संधी मिळेल,” मेहबुबा म्हणाल्या.

दहशतवादविरोधी कारवाईला देण्यात आलेल्या स्थगितीचा आढावा घेण्यासाठी राजनाथ सिंह काश्मिरमध्ये आले आहेत. काश्मिरचा चेहरा-मोहरा आणि भविष्य दोन्हीही बदलेल असा आशावाद व्यक्त करताना सिंह यांनी क्रीडाक्षेत्रातील पायाभूत सुविधांसह अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केलं.
काश्मिरमधल्या तरूणांना सुरक्षा दलांमध्ये नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे राजनाथ म्हणाले. परंतु राज्यातल्या तरुणांनी कुठल्याही गैरकृत्यांमध्ये सहभाग घेऊ नये असे आवाहनही त्यांनी केले.

इथल्या मुलांमध्ये प्रचंड क्षमता आहे परंतु सध्या ते अंधारात असल्याचे सांगत केंद्र व राज्य सरकार मिळून परिस्थिती बदलेल असे आश्वासन त्यांनी दिले. मुफ्ती मेहबुबा यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये राजनाथ सिंह संध्याकाळी सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच ते लष्कराच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.