महाराष्ट्रात परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब आणि त्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनी आरोप केलेलं पोलीस बदली रॅकेट प्रकरण यावर चर्चा सुरू असताना तिकडे आसाममध्ये प्रचाराचा धुमधडाका सुरू आहे. आसाम विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही प्रमुख पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला असून यातून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे पक्ष सोडताना दिसत नाहीयेत. नुकतीच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची दिब्रुगढमध्ये प्रचारसभा झाली असून आता भाजपाकडून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आसामच्या लुमडिंगमध्ये जाहीर सभा घेतली. यामध्ये त्यांनी काँग्रेसवर खोचक शब्दांमध्ये टीका केली.

‘रिअल चायवाला!’

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘चायवाला’ अशी संभावना करत काँग्रेसकडून अनेकदा त्यांच्यावर टीका केली गेली आहे. त्यावरून राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “आधी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ज्यांनी ‘चायवाला’ असं म्हणत खिल्ली उडवली होती, तीच लोकं आज चहापत्ती खुडत आहेत आणि विकत आहेत. खऱ्या चायवालाने त्यांना चहाच्या मळ्यांपर्यंत आणून सोडलं आहे. पण खबरदार, खरा आणि प्रमाणित चायवाला आमच्यासोबत आहे”, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत.

 

प्रियांका गांधींचे फोटो व्हायरल!

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आसाममध्ये चहाच्या मळ्यांमध्ये जाऊन तिथल्या महिला मजुरांसोबत चहाची पानं खुडली होती. त्याचे फोटो देखील मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ५ राज्यांमध्ये निवडणुका जाहीर होण्याच्याही आधीपासून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी अशा प्रकारे लोकांमध्ये जाऊन त्यांच्यात अधिकाधिक मिसळण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतेच राहुल गांधी यांचे आसाममध्ये मजुरांसोबत जेवतानाचे फोटोही व्हायरल झाले होते.

“प्रियांकाजी, तुम्ही तेव्हा चित्रपटाचं शूटिंग करत होत्या का?” शिवराजसिंह चौहान यांचा खोचक टोला!