राज्यसभेत आज बहुचर्चित मोटर वाहन दुरुस्ती विधेयक – २०१९ प्रदीर्घ चर्चेनंतर १३ विरूद्ध १०८ अशा फरकाने मंजूर झाले. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत हे विधेयक मांडले. या विधेयकातून रस्ते अपघात रोखण्यावर भर देण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट दंड आकारण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

हे विधेयक सादर करताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी हे मान्य केली की, देशात मागिल पाच वर्षात रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच, यामध्ये होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमुळे रस्ते सुरक्षाच्या सध्याच्या कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. राज्यसभेत विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना गडकरींनी हे स्पष्ट केले की, सरकारचा मोटर वाहन दुरुस्ती विधेयकाद्वारे राज्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचा कोणताही विचार नाही.

दरम्यान या विधेयकानुसार आता हेल्मेट न वापरणाऱ्यास १०० रूपयां ऐवजी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. शिवाय वाहनचालकाचं लायसन्स तीन महिन्यांसाठी जप्त करण्यात येणार आहे.दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यास दोन हजारांऐवजी आता दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. तर हिट अँड रन केसमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबीयांना दोन लाखांची भरपाई देण्यात येणार आहे. तसेच, गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास व परवान्याशिवाय गाडी चालवणाऱ्यास ५ हजाराचा दंड आकारण्यात येणार आहे. तर, आता वाहनचालकांना मोबाईलद्वारेच टोल भरता येणार आहे. त्यामुळे आता कुणालाही टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबण्याची गरज पडणार नाही. वाहन चालवण्याची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला घर बसल्याचं ऑनलाइन वाहन शिकत असल्याचा परवाना मिळणार आहे.