वेश्यालयातून सुटका करून घेतलेल्या युवतीची रक्षाबंधना दिवशी मोदींना राखी आणि अडकलेल्यांच्या सुटकेची आर्त हाकही ‘‘प्रिय भाऊराया, कुंटणखान्यातील अंधाऱ्या जगातून माझी तर सुटका झाली. पण माझ्यासारख्या कितीतरी शेकडो कोवळ्या मुली-महिला अजूनही त्या नरकात खितपत पडल्यात. त्या सगळ्यांचे तुम्ही भाऊ आहात. त्या बहिणींची रक्षा करण्यासाठी तुम्ही काही तरी कराच..’’ हे पत्र तवी या युवतीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलंय आणि तेही रक्षाबंधनाच्या दिवशी. प्रियकराने फसवून कुंटणखान्यात विकलेली आणि हिमतीने परिस्थितीला तोंड देत मुंबई पोलिसांच्या मदतीने त्या अंधारकोठडीबाहेरचे जग पाहणारी ही तवी. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र महिला आयोगाने मुली-महिलांच्या तस्करीसंदर्भात मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद घेतली होती, त्यावेळी तवीच्या धाडसाचा सत्कार केला होता. त्यावेळी तिची आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याशी ओळख झाली होती. रहाटकर या भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षाही. त्या सोमवारी राखी बांधण्यासाठी मोदींना भेटणार होत्या. हे समजल्यावर तवीने त्यांच्यासोबत मोदींसाठी एक राखी तर पाठविलीच, पण त्याबरोबर भावनेला हात घालणारे आणि कुंटणखान्यात अडकलेल्या असंख्य मुलींच्या हालअपेष्टांचे वर्णन करणारे स्व:हस्ताक्षरातील एक पत्रही दिले. रहाटकरांनी ती राखी आणि पत्र मोदींकडे सुपूर्द केले. महिला तस्करीला मी सहा वर्षे बळी पडले. कुंटणखान्याचे ते जग यातनामय होते. मला बेदम मारायचे. बळजबरीने व्यवसाय करायला लावायचे.. तोही जनावरांपेक्षा वाईट. आपण इथेच मरून जाणार असे वाटायचे. पण सुदैवाने मुंबई पोलिसांनी माझी या नरकातून सुटका केली. आता मी मुक्त जगते आहे. एका वस्त्रोद्योग कंपनीमध्ये काम करते आहे, अशी स्वत:ची थोडक्यात कहाणी सांगून तवीने लिहिलंय, ‘‘मी सुदैवाने सुटले, पण माझ्यासारख्या असंख्य मुली-महिलांना फसवून जागोजागच्या कुंटणखान्यांमध्ये डांबून ठेवलेले आहे. त्यांना मारहाण केली जाते, अनन्वित अत्याचार केले जातात. बळजबरी केली जाते. तुम्ही त्या सगळ्यांचे भाऊ आहात आणि माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, की त्या बहिणींची रक्षा करण्यासाठी तुम्ही काहीतरी नक्कीच करा.’’