भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे खासदार राम जेठमलानी यांनी भाजपला पुन्हा एकदा घरचा अहेर दिला आहे. केंद्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकपदी रणजीत सिन्हा यांची तडकाफडकी नियुक्ती झाल्याने काँग्रेसवर टीका करणाऱ्या स्वपक्षाच्या नेत्यांना जेठमलानी यांनी शनिवारी फटकारले. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी या प्रकरणी केलेली टीका अनाठायी आहे, असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने केंद्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकपदी रणजीत सिन्हा यांची घाईघाईत नेमणूक केल्याने राजधानीत संशयाचे वातावरण निर्माण झाले होते, तसेच राजकीय वर्तुळात या निर्णयाचे पडसाद उमटले होते. भाजपनेही या प्रकरणी केंद्रावर जोरदार टीका केली होती. केंद्र सरकारने या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी भाजपचे नेते सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे शुक्रवारी पत्राद्वारे केली होती. या पत्रामुळे केंद्र सरकार अडचणीत येणार, असे वाटत असतानाच जेठमलानी यांनी शनिवारी उघडपणे विरोधी विधान करुन भाजपला अडचणीत आणले. ‘आमच्या पक्षाच्या नेत्यांनी सीबीआयच्या संचालकांच्या नियुक्तीवरुन केंद्र सरकारवर केलेल्या टीकेमुळे मी आश्यर्चचकीत झालो आहे. सिन्हा यांची नियुक्ती कोणत्या परिस्थितीत करण्यात आली, या संबंधित कारणांकडे आमच्या नेत्यांनी डोळेझाक केली आहे, त्यामुळे त्यांनी केलेली टीका अनाठायी आहे, याशिवाय सिन्हा यांच्या एका हितशत्रुच्या चिथावणीमुळेच आमच्या नेत्यांनी या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे,’ अशा आशयाचे पत्रक जेठमलानी यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांना दिले. या पत्राच्या प्रती त्यांनी नितीन गडकरी व पंतप्रधानांनाही धाडल्या.         

जेठमलानी व सिन्हा यांची मागणी योग्यच – शत्रुघ्न सिन्हा
पाटणा : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याबाबत राम जेठमलानी व यशवंत सिन्हा यांनी केलेल्या मागणीला आपला तत्वत: पाठिंबा आहे, असे या पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.जेठमलानी व सिन्हा यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर असल्याचे सांगून शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, की व्यक्तिगत पातळीवर गडकरी हे माझे मित्र आहेत, परंतु ते ज्या जबाबदारीच्या पदावर आहेत त्या पदावरील व्यक्तीने केवळ प्रामाणिक असणे महत्वाचे नसून ती प्रामाणिक असल्याचे दिसणेही तितकेच महत्वाचे आहे.