अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला. भूमिपूजन सोहळा पार पडताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी प्रभुरामचंद्रांच्या गुणांचं वर्णन त्यांनी केलं आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, “मर्यादा पुरूषोत्तम भगवान राम सर्वोच्च मानवीय गुणांचं स्वरूप आहे. राम आपल्या मनात खोलवर बसलेल्या मानवतेची मूळ भावना आहे.
राम प्रेम आहे. ते कधीच द्वेषातून प्रकट होऊ शकत नाही.
राम करूणा आहे. ते कधी क्रूरपणे प्रकट होऊ शकत नाही.
राम न्याय आहे. ते कधी अन्यायातून प्रकट होऊ शकत नाही,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “रामापेक्षा स्वतःला मोठं दाखवून,….”; पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ फोटोवर काँग्रेसनं साधला निशाणा

आणखी वाचा- “ते एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करत आहे आणि आम्ही…”; ओमर अब्दुला संतापले

राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. पायाभरणी कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केलं. सुरूवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं अयोध्येत स्वागत केलं.