शिक्षणाचे भगवेकरण देशासाठी चांगलेच असल्याचे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री रामशंकर कठेरिया यांनी मांडले आहे. देशाचे आणि शिक्षणाचे भगवेकरण करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याचा फायदाच होणार असल्याचे त्यांनी उत्तर प्रदेशमधील एका कार्यक्रमात सांगितले. उत्तर प्रदेशातील लखनऊ विद्यापीठामध्ये हिंदवी स्वराज्य दिवस समारंभामध्ये बोलताना कठेरिया यांनी भगवेकरणाचे स्पष्टपणे समर्थन केले. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईकही उपस्थित होते. रामशंकर कठेरिया म्हणाले, काही पत्रकार आम्हाला आम्ही शिक्षणव्यवस्थेचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत का, असा प्रश्न विचारतात. त्यांना मला सांगायचे आहे की, हो शिक्षणव्यवस्था आणि देशाचे भगवेकरण करण्याचे काम सुरूच आहे. देशासाठी जे काही चांगले आहे. ते होईलच. मग ते भगवेकरण असू दे की संघवाद. जगामध्ये आपल्या देशाचा सन्मान वाढवेल आणि देशाबद्दल स्वाभिमान जागृत करेल, अशा अभ्यासक्रमाची सध्या गरज आहे. गेली अनेक वर्षे आम्ही शांतपणे जे काही चालले आहे ते बघत आलो आहोत. पण आता परिस्थिती अशी आलीये की जर आम्ही महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणून नाही घ्यायचा तर काय चंगेज खानचा इतिहास शिकायचा का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.