बिहारनंतर आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि एनडीएनं कंबर कसली आहे. दरम्यान, रिपाइं आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी या निवडणुकीच्या रणांगणात आपला पक्षही उतरणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच या निवडणुकीत कोण बाजी मारेल याबाबत भाकीतही केलं आहे.

ट्विटद्वारे आठवले म्हणाले, “पश्चिम बंगालच्या दहा विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आपले उमेदवार उभे करणार आहे. आगामी निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव होईल तर एडीएचं सरकार बनेल.”

रामदास आठवले यांचा रिपाइं पक्ष हा एनडीएचा भाग असून आठवले स्वतः मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यातच पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी म्हणजेच भाजपासाठी प्रतिष्ठेची असणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा आपल्या मित्रपक्षांनाही मदतीसाठी घेऊ शकते.

याच पार्श्वभूमीवर आठवले यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे घोषीत केले असून ‘एनडीए’चाच विजय होईल असा विश्वासही व्यक्त केला आहे.