औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेने केली असून काँग्रेसने याला विरोध केला आहे. यावरुन भाजपाने शिवसेनेला टार्गेट केले आहे. दरम्यान, औरंगाबादच्या नामांतरणाविरोधात भूमिका घेणाऱ्या रामदास आठवले यांच्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली. मात्र, काही वेळाने त्यांनी ट्विट डिलीट करत नामांतरणाच्या मुद्द्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.


येत्या काळात औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे. यापार्श्वभूमीवर शहराचे नाव बदलण्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेसने याला विरोध केला आहे. यावरुन भाजपाने शिवसेनेवर शरसंधान साधले असून निवडणुकीपुरतीच शिवसेना ही भूमिका घेत असल्याचा आरोप करत अत्ताही असचं सुरु असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रिपाईंच्या रामदास आठवले यांनी रविवारी आपलाही औरंगाबादच्या नामांतराला विरोध असल्याचं ट्विट केलं. मात्र, काही वेळातच त्यांनी आपलं ट्विट डिलीट केलं. यावरुन त्यांनी आधी विरोध केला नंतर पळ काढल्याची चर्चा सुरु आहे.