पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जिवाला धोका असल्याचे योगगुरु रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दहशतवाद्यांकडे असणारा काळा पैसा आता निरुपयोगी झाला आहे,' असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा पैसा आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. मोदींच्या निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांचे आणि दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. दहशतवाद्यांकडे असणारा पैसा आता निरुपयोगी झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मोदींच्या जिवाला धोका आहे,' असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. 'मोदींचा नोटाबंदीचा निर्णय हा देशहिताचा आहे. मात्र मोदींच्या या निर्णयामुळे अनेकांचे हितसंबंध दुखावले गेले आहेत. दहशतवाद्यांकडे असणारा पैसा हा त्यांचा मोठा आधार होता. मात्र आता हा आधारच काढून घेतल्याने दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतात येणारे बनावट चलन पाकिस्तानातून येत होते. मात्र मोदींच्या निर्णयाचा फटका पाकिस्तानलादेखील बसला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मोदींच्या जिवाला धोका आहे,' असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. 'पंतप्रधान मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे आर्थिक गुन्हे, दहशतवाद, भ्रष्टाचार यांना आळा बसणार आहे. या निर्णयामुळे राजकीय माफिया, ड्रग माफिया, दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळेच मोदींच्या जिवीताला धोका आहे,' असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. 'पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे देशाला मोठा फायदा होईल. यामुळे देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढेल, व्याजदरांमध्ये घट होईल, महागाई कमी होईल,' असेही रामदेव बाबा यांनी म्हटले आहे.