बिहारचे माजी मुख्यमंत्री व राजद नेते लालूप्रसाद यादव व मुख्यमंत्री नितीश कुमार हे जयप्रकाश नारायण (जेपी) यांनी दाखवलेल्या मार्गापासून केव्हाच दूर गेले आहेत व त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करून लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा अवमानच केला आहे, अशी टीका लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पास्वान यांनी केली. नितीश व लालू यांनी जयप्रकाश नारायण यांचा मान ठेवला नाही, त्यामुळे त्यांना त्यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे पास्वान यांनी जयप्रकाश नारायण यांच्या चरखा समिती येथील निवासस्थानी भेट दिल्यानंतर सांगितले. नंतर त्यांनी गांधी मैदान येथे जाऊन लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.पास्वान म्हणाले की, जयप्रकाश नारायण यांच्या पुतळ्याची निगाही राखण्यात आलेली नाही, त्यावरची धूळ पुसण्यात आलेली नाही व तेथे दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार जयप्रकाश नारायण यांचे आदर्श पुढे नेणार आहे व त्यासाठी देशातील तरूणांना ताकद दिली
जाईल.