बलात्कार पीडितेकडून रक्ताने पत्र लिहून याचना

बलात्कारपीडितेने न्याय मिळण्यासाठी आणि आरोपींना शिक्षा करण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिले आहे.

आरोपींचे उच्चपदस्थांशी लागेबांधे असल्याने पोलीस कोणतीही कारवाई करीत नसून आरोपी खटला मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणत आहेत. आपल्याला न्याय द्यावा अन्यथा आपण आत्महत्या करू, असे पीडितेने २० जानेवारी रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशी शेखर सिंह यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, २४ मार्चला दिव्या पांडे आणि अंकित वर्मा यांच्याविरुद्ध बाराबंकी येथे बलात्काराच्या आरोपाबाबत एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलीवर आरोपींनी बलात्कार केला आणि तेव्हापासून ते तिला ब्लॅकमेल करीत असल्याचे पीडितेच्या वडिलांनी म्हटले आहे.