रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तीन बँकावर दंडात्मक कारवाई केली आहे. पुण्यातील जनता सहकारी बँक, जळगाव पिपुल्स सहकारी बँक आणि बंधन बँकेवर आरबीआयकडून कारवाई करण्यात आली आहे.

आरबीआयच्या दिशानिर्देशांचं पालन न केल्यामुळे जनता सहकारी बँक व जळगाव पिपुल्स सहकारी बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे. या दोन्ही बँकांना अनुक्रमे एक कोटी रुपये व 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर, ऑगस्ट 2015 पासून पूर्ण क्षमतेने कामकाजाला सुरुवात करणाऱ्या बंधन बँकेने प्रवर्तक हिस्सेदारी 40 टक्क्यांवर न आणल्याबद्दल आरबीआयने एक कोटीचा दंड ठोठावला आहे. याआधी आरबीआयने तामिळनाडूमधील मर्केंटाईल बँकेवर कारवाई करत 35 लाख रुपयांचा दंड केला होता. फसवणूक प्रकरणांची नियमांनुसार योग्य माहिती न देण्याबाबत ही कारवाई झाली होती.

आरबीआयने काही दिवसांपूर्वीच पीएमसी बँकेवर निर्बंध आणले. त्यानंतर आता या तीन बँकांवर केलेल्या कारवाईमुळे भविष्यात पीएमसी बँकेप्रमाणेच कारवाई होणार की काय या कारणामुळे बँकांच्या खातेधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.