“भारतात असलेली अयोध्या ही बनावट आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी होते” असं वक्तव्य नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली  यांनी केलं आहे. भारताने सांस्कृतिक आक्रमण करुन बनावट अयोध्या निर्माण केली. वास्तवातली अयोध्या नेपाळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नसून नेपाळी आहेत असं वक्तव्य ओली यांनी केलं आहे. तसंच आपल्याला पंतप्रधान पदावरुन दूर करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरु आहेत असंही ओली यांनी म्हटलं आहे.

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली हे सातत्याने भारतावर निशाणा साधत आहेत. सोमवारी ओली यांनी सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने बनावट अयोध्या निर्माण केल्याचा दावा केला आहे. अयोध्या भारतात नसून नेपाळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी असल्याचंही त्यांनी म्हटं आहे. कवी भानुभक्त आचार्य यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर नेपाळवर सांस्कृतिकदृष्ट्या अत्याचार केला गेल्याचंही म्हटलं आहे. याआधी करोना संसर्गावरुनही त्यांनी भारतावर टीका केली होती. भारतातून येणार करोनाचं संक्रमण हे चीन आणि इटलीतून येणाऱ्या संक्रमणापेक्षा जास्त घातक आहे असं त्यांनी म्हटलं होतं.

“राजपुत्र असलेल्या रामाला आम्ही सीता दिली असं आम्ही आजही मानतो. मात्र आम्ही भारतात असलेल्या अयोध्येच्या राजकुमाराला सीता दिली नाही. अयोध्या नावाचं गाव बीरगंजच्या पश्चिमेला आहे. मात्र भारतात असलेली अयोध्या खरीखुरी नाही”, असाही दावा ओली यांनी केला. “भारतातली अयोध्या खरी असेल तर तिथला राजकुमार लग्नासाठी जनकपूरला कसा येऊ शकतो ?” असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. विज्ञान आणि ज्ञानाची उत्पत्ती आणि विकास नेपाळमध्ये झाल्याचाही दावा ओली यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट वक्तव्यांमुळे केपी ओली शर्मा हे चर्चेत आहेत. तसेच नेपाळमध्ये त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरु लागली आहे.