बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मतांच्या पाठिंब्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्य करण्याची इच्छा आहे, मात्र हे बेकायदेशीर स्थलांतरितच खरेखुरे उपरे आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी येथे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्यावर टीका करण्याशिवाय ममतांकडे अन्य कोणताही कार्यक्रम नसल्याचेही शहा म्हणाले.

निवडणुकीदरम्यानच्या प्रत्येक सभेत ममता बॅनर्जी या मोदी आणि आपल्यावर टीका करण्यात १० मिनिटे वाया घालवतात, आपण देशाचे गृहमंत्री आहोत, आपण जनतेशी संवाद साधू शकत नाही का, आपण उपरे कसे, असा सवाल शहा यांनी हरिरामपूर येथील एका जाहीर सभेत केला.

आपण याच देशात जन्मलो आणि मृत्यूनंतर याच पवित्र भूमीत आपल्यावर अंत्यसंस्कार होतील, परंतु बेकायदेशीर स्थलांतरित हीच तुमची मतपेटी असून तेच उपरे आहेत आणि त्यांच्या मतांच्या जोरावरच तुम्हाला येथे राज्य करावयाचे आहे, असा हल्ला शहा यांनी ममतांवर चढविला. हेच बेकायदेशीर स्थलांतरित डावे आणि काँग्रेस पक्ष यांच्याही मतपेट्या आहेत, असे गृहमंत्री म्हणाले.