करोना संकटाला तोंड देत असलेल्या पंजाबमध्ये आता नवं राजकीय संकट देखील निर्माण झाल्याचं दिसत आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र त्या अगोदर पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस हायकमांडकडून यामध्ये लक्ष घातल्या जात आहे. काँग्रेस हायकमांडकडून पक्षाच्या आमदार व मंत्र्यांना दिल्लीत बोलवलं गेलं आहे. या ठिकाणी सर्व आमदार, मंत्री एका तीन सदस्यीय पॅनलशी चर्चा करणार असून, त्यांच्या समोर आपले म्हणणे मांडणार आहेत.

काँग्रेसचे जवळपास २० आमदार ज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल झाखड, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंह रंधावा यांचाही समावेश आहे. हे सर्वजण दिल्लीत पोहचले आहेत. निवडणुक काळात काँग्रेसकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पुर्तता न करण्यात आल्याच्या आरोपानंतर, काँग्रेस आमदरांकडून आपल्याच सरकारवर प्रश्न निर्माण केले जात होते. हे सर्व आमदार सातत्याने मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करत होते. आज तकने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

केंद्रीय हायकमांडने जे तीन सदस्यीय पॅनल बनवले आहे, त्याचे नेतृत्व हरीश रावत करत आहेत. त्यांच्याशिवाय मल्लिकार्जुन खरगे आणि जेपी अग्रवाल यांचा यामध्ये समावेश आहे. आज हे पॅनल आमदारांशी चर्चा करणार आहे.
तसेच, चरणजीत सिंह चन्नी, सुखजिंदर सिंह रंधावा हे देखील या पॅनलशी चर्चा करणार आहेत. तर, उद्या (मंगळवार) नवज्योत सिंग सिध्दू, परगट सिंह पॅनला भेटतील. विशेष म्हणजे कॅप्टन अमरिंदर यांच्या गोटातील मानले जाणारे मनप्रीत बादल, साधु सिंह हे देखील दिल्लीत असून पॅनलशी चर्चा करणार आहेत. यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह हे या पॅनलशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आणखी वाचा- “मुख्य सचिवांना पाठवता येणार नाही”; ममता बॅनर्जींचे पंतप्रधान मोदींना पत्र

लोकसभा निवडणुकीनंतर पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर येण्यास सुरूवात झाली. नवज्योत सिंग सिद्धू सातत्याने मुख्यमंत्री अमरिंदर सिंह याच्याविरुद्ध भूमिका घेताना दिसून आले आहे. याशिवाय पक्षातील अनेक नेत्यांनी देखील मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. आता पुढील वर्षात विधानसभा निवडणूक होणार असल्याने, काँग्रेस हायकमांड हा अंतर्गत कलह मिटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.