जीवघेण्या करोना व्हायरसला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन केले असल्याने रिलायंस इंडस्ट्रीजने(RIL) काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. यातील एक महत्त्वाची घोषणा कंपनीच्या त्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, ज्यांचं महिन्याचं वेतन ३० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. ३० हजार रुपयांपेक्षा कमी वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना महिन्यात दोन वेळेस पगार दिला जाईल अशी घोषणा कंपनीने केली आहे.

“कमी वेतन असलेल्यांचा आर्थिक ताण कमी व्हावा यासाठी कंपनीने त्यांना महिन्यातून दोन वेळेस वेतन देण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे अचानक काही समस्या उद्भवल्यास त्या कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भासणार नाही”, असं निवेदन कंपनीकडून देण्यात आलं आहे. तसेच, समूहाच्या विविध कंपन्या, विभागात कार्यरत असलेले कंत्राटी तसेच तात्पुरते कर्मचाऱ्यांना नियमित वेतन दिले जाईल, असेही रिलायंसने स्पष्ट केले आहे.

रिलांयस परिवारातील सहा लाख सदस्य करोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी तयार आहेत. करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने पुढाकार घेत मुंबईत विशेष रुग्णालय सुरू केलं असून अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र १०० बेड्सची सुविधा करण्यात आलीये, अशी माहितीही कंपनीने दिली. याशिवाय, करोनाशी लढा देण्यासाठी रिलायंस इंडस्ट्रीजकडून आर्थिक मदत देण्यात आली असून मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्सने महाराष्टाच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तसंच करोना रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व आपत्कालीन सेवा वाहनांसाठी मोफत इंधन उपलब्ध करून दिले जाणार आहे. रिलायंस इंडस्ट्रीजने दिवसाला एक लाख मास्क तयार करण्यापर्यंतची क्षमता वाढविली आहे. याशिवाय, रिलायंस फाऊंडेशनमार्फत विविध शहरांमध्ये गरजूंना मोफत जेवण पुरवले जाणार आहे.