‘प्रिमिअर डिजिटल सोसायटी’ आणि जगातील तीन बलाढ्य अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट होण्याची संधी भारताकडे असल्याचं मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी व्यक्त केलं. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला सोमवारी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ‘फ्यूचर डिकोडेड समिट’चे आयोजन करण्यात आले होते. या समिटला संबोधित करताना अंबानी बोलत होते. “ट्रम्प २०२० मध्ये जो भारत पाहतील तो कार्टर, क्लिंटन आणि ओबामा यांनी पाहिलेल्या भारतापेक्षा वेगळा असेल,” असं अंबानी यावेळी म्हणाले.

“२०२० मध्ये नवा भारत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं स्वागत करत आहे. देशातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन आलं असून डिजिटल अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही भारत उत्तमरित्या प्रगती करत आहे,” असंही अंबानी यावेळी म्हणाले. “भारत कशाप्रकारे प्रगती करत आहे, याचं मोटेरा स्टेडिअम उत्तम उदाहरण आहे. या स्टेडिअममधील डिजिटल व्यवस्था ही जगातील कोणत्याही ठिकाणापेक्षा उत्तम आहे. हा नवा भारत आहे. जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होईल याबाबत कोणतीही शंका नाही. फक्त हे पुढील पाच वर्षांमध्ये होईल की दहा वर्षांमध्ये हा चर्चेचा विषय आहे,” असं त्यांनी सांगितलं.

छोट्या उद्योजकांमध्ये अंबानी , गेट्स होण्याची क्षमता
“आम्ही ज्या भारतात मोठे झालो, येणारी पिढी त्यापेक्षा वेगळा भारत पाहिल. जास्तीत जास्त लोकांना समाविष्ट करून घेईल, असं तंत्रज्ञान देशातील उद्योगपतींनी आत्मसाद केलं पाहिजे. लघु आणि मध्यम उद्योग सक्षम झाल्यास त्याचा फायदा देशाला होईल. भारतातील प्रत्येक छोटे व्यवसायिक आणि उद्योजकांमध्ये धीरूभाई अंबानी किंवा बिल गेट्स बनण्याची क्षमता आहे आणि तिच शक्ती भारताला अन्य देशांपेक्षा वेगळी बनवते,” असं अंबनी म्हणाले.

लघु उद्योजकांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज
“लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग भारतातील ७० टक्के रोजगार देतात. देशातील निर्यातीपैकी ४० टक्के निर्यात ही हे उद्योग करतात,” असंही अंबानी यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी भारतातील मोबाईल नेटवर्कची प्रशंसा केली. “भारतातील मोबाईल नेटवर्क आता जगातील कोणत्याही मोबाईल नेटवर्कप्रमाणे किंवा त्याप्रमाणेच आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.