पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं आणि राज्यपाल जगदीप धनखर यांच्यातील वाद देशाला नवीन नाही. या दोघांमध्ये नेहमीच शाब्दीक वाद होत असतात. दरम्यान या दोघांमधील संघर्ष अधिकच वाढला आहे. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडे जगदीप धनखर यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. यासह ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की, ते बंगालला त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते भ्रष्ट आहेत आणि १९९६ च्या हवाला जैन प्रकरणात त्यांच्यावर आरोप होते. त्याच्यांविरोधात आरोपपत्र देखील दाखल केले होते. ते भ्रष्ट असून त्यांना हुकुम करायचा असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

नबान्न येथे पत्रकारांना संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “असे राज्यपाल यापूर्वी कधी पाहिले नव्हते. (Gorkhaland Territorial Administration )जीटीएच्या तपासणीपूर्वी राज्यपालांच्या भेटीची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी कोणत्या लोकांना आपल्याबरोबर घेतले? याची चौकशी झाली पाहिजे. ते उत्तर बंगालमध्ये का गेले? आपण कोणाला भेटलात? भाजपाचे आमदार,खासदार अचानक उत्तर बंगालमध्ये का गेले.”

ममता बॅनर्जी यांनी तीनवेळा केंद्राकडे राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. राज्यपाल जगदीप धनखर उत्तर बंगालच्या दौर्‍यावरुन कोलकाताला परतले आहेत. दरम्यान त्यांनी जीएटीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.

हेही वाचा- उत्तर प्रदेशमधील करोना रुग्णांचे मृतदेह गंगेच्या पाण्यासोबत पश्चिम बंगालमध्ये येतात : ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, राज्यपाल मुद्दाम उत्तर बंगालला त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे राज्यपाल यापूर्वी पाहिले नव्हते. राज्यपाल लोकांना आंदोलन करायला लावतात, हे राज्यपालांचे काम आहे का?

“राज्यपाल जगदीप धनखर यांचे नाव हवाला जैन प्रकरणात होते. त्यांना कोर्टाने दिलासा दिला होता. त्यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सध्या न्यायालयात हे खटले प्रलंबित आहेत. ते भ्रष्ट माणूस आहेत. ते प्रत्येकाला हुकुम देतात. आम्ही काय खावे, हे देखील ते सांगतिल का? केंद्र सरकार कधी राज्यपाल पाठवते तर कधी मानवधिकार आयोग पाठवत आहे. करोना महामारीत देखील हे सगळं सुरु आहे. उत्तर प्रदेशात गंगेत १०० मृतदेह आढळले त्यांची चौकक्षी का नाही झाली. ते फक्त बंगालमध्येच अडथळे निर्माण करीत आहेत.”, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.