सोशल मीडिया झपाट्याने बदलत असून त्याची व्याप्तीही मोठी आहे. हे एक दुधारी शस्त्रच असून लोकप्रियता विशेष करून सवंग लोकप्रियता हे त्या माध्यमाच्या यशाचे गमक झाले आहे. मात्र यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारला धोरण आणावे लागेल,असे प्रतिपादन मेजर जनरल नीतिन गडकरी (निवृत्त) यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरने रविवारी आयोजित केलेल्या ऑनलाइन संवादामध्ये मेजर जनरल नीतिन गडकरी (निवृत्त) बोलत होते.

भारतातील सोशल मीडियाच्या शस्त्राला कसे रोखावे, या विषयावरील एका महत्त्वपूर्ण संवादात त्यांनी खूप मोलाची माहिती दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी ऑनलाइन कार्यक्रमात ही संवादवजा मुलाखत घेतली. मुलाखतीचा हा दुसरा भाग होता.

या सोशल मीडियामध्ये इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप असे विविध घटक येतात. लोकांना काय आवडते यावर हे सोशल मीडियाचे प्रकार असून त्यावर त्यांची लोकप्रियता अवलंबून आहे. हे त्यामुळे एक प्रकारचे शस्त्रच झाले असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, “प्रिंट मिडियासारखे जबाबदारीने बोलणारे वा जबाबदारी घेणारे येथे कोणीच नसते. सवंगपणामुळे मिळणारी लोकप्रियता आणि त्यामुळे अफवा वा खोट्या बातम्यांना बळी पडणे हे प्रकार येथे होतात. त्यात मिळणाऱ्या लाइक्सवर ही लोकप्रियता अवलंबून राहाते. विचार डावा असो वा उजवा त्यात सुधारणावादी विचारांना मात्र येथे विचारातही घेतले जात नाही. लोकांची मते, दृष्टिकोन विभाजित करणे व दुही पसरवणे हीच संकल्पना येथे निर्माण झाली आहे”.

“परदेशातील सामाजिक प्रसारमाध्यमांमधील, प्रिंट मिडियामध्ये भारतविरोधी बातम्या वा माहिती प्रसिद्ध होते . त्यांना उत्तर त्यांच्या स्पर्धक माध्यमातून देता येऊ शकते. उत्तर देण्याचे ते प्रमाण वाढवायला हवे. मुळात हे प्रकार थांबणारे नाही,” असेही गडकरी यांनी सांगितले.