भारतातील १ टक्का श्रीमंताकडे देशातील ७३ टक्के संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. तर ६७ कोटी भारतीयांच्या संपत्तीमध्ये फक्त एक टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती एका अहवालातून उघड झाली आहे. भारतातील गरीब आणि श्रीमंतांमधील दरी यानिमित्ताने समोर आली आहे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॅम या संस्थेचा 'रिवॉर्ड वर्क, नॉट वेल्थ' हा अहवाल रविवारी प्रसिद्ध झाला. देशातील आणि जागतिक पातळीवरील आर्थिक विषमता या अहवालातून समोर येते. जागतिक पातळीवर गेल्या वर्षभरात तयार झालेल्या एकूण संपत्तीतील ८२ टक्के वाटा हा एक टक्का लोकांकडे गेला. ३ अब्ज ७० लाख लोकांच्या संपत्तीमध्ये काहीच वाढ झालेली नाही. भारतातही फार वेगळे चित्र नाही. भारतातील एक टक्का श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये जवळपास २०. ९ लाख कोटी रुपयांनी वाढ झाली. जगातील १० देशांमधील सुमारे ७० हजार लोकांची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. सीईओंच्या पगारात कपात करावी, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६० टक्के लोकांना वाटते. भारतातील ३७ टक्के अब्जाधीशांकडे वारसाहक्काने संपत्ती आल्याचे अहवालातून समोर येते. ऑक्सफॅमच्या भारतातील सीईओ निशा अग्रवाल यांनी या अहवालावर चिंता व्यक्त केली आहे. 'केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक सोयीसुविधांचा लाभ मूठभर लोकांपर्यंतच पोहोचत असल्याचे यानिमित्ताने दिसते', असे त्या म्हणाल्यात. अब्जाधीशांची वाढती संख्या हे चांगल्या अर्थव्यवस्थेचे लक्षण नाही. तर ढासळत्या अर्थव्यवस्थेचे लक्ष आहे. एकीकडे बांधकाम साईटवर काम करणारे मजूर, शेतमजूर, कंपनीत काम करणारे कामगार यांच्याकडे मुलांच्या शिक्षणासाठी, औषधांच्या खरेदीसाठीही पैसे नाही. तर दुसरीकडे अब्जाधीश वाढत आहेत, याकडे अग्रवाल यांनी लक्ष वेधले. भारतात फक्त ४ महिला अब्जाधीश असून यातील तीन जणांकडे वारसाहक्काने संपत्ती आली आहे. देशातील १०१ अब्जाधीशांपैकी ५१ जण हे ६५ वर्षांवरील आहेत. त्यांच्याकडे एकूण १० हजार ५४४ अब्ज रुपये इतकी संपत्ती आहे. अब्जाधीशांच्या संपत्तींमध्ये २०१० पासून वर्षाला सरासरी १३ टक्के या वेगाने भर पडत आहे.