बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि लष्कराच्या जवानांच्या परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. शेतकरी आणि जवान हे देशाचे दोन प्रमुख आधारस्तंभ आहेत. पण ते सध्या कठिण प्रसंगातून जात आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार २०१९ मधील लोकसभा निवडणुकांपूर्वीच कोसळेल, अशी भविष्यवाणी लालूप्रसाद यांनी केली आहे.

चारा घोटाळा प्रकरणी सीबीआय न्यायालयात हजर होण्यासाठी रांचीमध्ये दाखल झालेल्या लालूप्रसाद यादव यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्या आणि लष्कराच्या जवानांच्या परिस्थितीच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. मध्य प्रदेशात आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात ५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. याविषयी बोलताना त्यांनी मोदींना लक्ष्य केले. एक तर शेतकऱ्यांची हत्या केली जात आहे. तर दुसरीकडे शेतकरी स्वतःच आत्महत्या करत आहे. मोदी सरकारच्या काळात आतापर्यंत १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, असे लालूप्रसाद म्हणाले. मोदी ५६ इंचाची छाती असल्याचे म्हणत होते. कुठे गेली ५६ इंचाची छाती? अच्छे दिन कधी येणार, असा सवालही त्यांनी केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच मोदी सरकार पडेल, असे भाकितही त्यांनी केले.

सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मोदी सरकारविरोधात विरोधकांची एकजूट करण्यासाठी २७ ऑगस्ट रोजी गांधी मैदानात रॅली काढणार आहे. या रॅलीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसप प्रमुख मायावती यांच्यासह इतर पक्षांचे नेतेही सहभागी होणार आहेत. त्यांना या रॅलीचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे, अशी माहितीही लालूप्रसाद यादव यांनी यावेळी दिली.