शनिवारी दिवसभर दिल्लीच्या विविध भागांतून निदर्शक मोठय़ा संख्येने या परिसरात दाखल होत होते. त्यामुळे इंडिया गेटसह दिल्लीच्या सर्व दिशांना जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती. दुपारनंतर इंडिया गेटकडे जाणारे चार प्रमुख रस्ते पोलिसांना बंद करावे लागले.
अशी अभूतपूर्व परिस्थिती उद्भवल्यामुळे निदर्शकांच्या भावना समजून घेण्यासाठी शिंदे यांनी पुढाकार घेत त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली. निदर्शकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाच मुलींना भेटण्यासाठी गृहमंत्री तयार असल्याची घोषणा विजय चौकात पोलिसांनी ध्वनिक्षेपकावरून केली. विजय चौक आणि राजपथावर जमलेल्या उग्र निदर्शकांनी शांतता पाळावी, असे पोलिसांकडून वारंवार आवाहन करण्यात येत होते. निदर्शकांनी शांतता राखावी, असे आवाहन गृह राज्यमंत्री आर. पी. एन. सिंह करीत होते.