राजस्थानमधील जयपूर येथे झालेल्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी रॉबर्ट वड्रा सक्तवसुली संचनलालयासमोर (ईडी) हजर झाले. याआधी त्यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आईसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की, आपण आपल्या ७५ वर्षीय वयस्कर आईसोबत ईडीसमोर हजर होण्यासाठी आलो आहोत. केंद्र सरकार सूड भावनेने एका वयस्कर व्यक्तीशी अशा पद्धतीने कसं काय वागू शकतं हे कळंत नाही आहे.  पुढे त्यांनी लिहिलं आहे की, माझ्या आईने कुटुंबातील तीन व्यक्तींना गमावलं आहे. मात्र माझ्यासोबत असल्याने तिलाही आरोपी करण्यात आलं आहे. देव आमच्यासोबत आहे असंही या पोस्टच्या शेवटी त्यांनी लिहिलं आहे.

रॉबर्ट वड्रा एका जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी बिकानेरला पोहोचले होते. मात्र त्याआधीच फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत आपला रोष व्यक्त केला. केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी विचारणा केली की, जर मी एखादं बेकायदेशीर काम केलं होतं तर मग सरकारला चौकशी करण्यासाठी चार वर्ष आठ महिन्यांचा वेळ का लागला ? माझ्या ७५ वर्षीय आईशी सूड भावनेने का वागलं जात आहे हे कळत नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

रॉबर्ट वड्रा यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एका कार दुर्घटनेत त्यांच्या बहिणीचा तसंच डायबेटिजमुळे भावाचा आणि वडिलांचा मृत्यू झाला होता. यानंतर आपण आईला नेहमी आपल्यासोबत ठेवत होतो. दोघांनीही दुख: विसरुन जावं तसंच तिला एकटं वाटू नये यासाठी आपण तिला आपल्या कार्यालयात आपल्यासोबत वेळ घालवण्यास सांगत होतो. पण यामुळे आपल्या आईलाही आरोपी करण्यात आलं.

दिल्लीमध्येही ईडीकडून रॉबर्ट वड्रा यांची चौकशी होत आहे. यानंतर त्यांना राजस्थानला बोलावण्यात आलं होतं. ईडी रॉबर्ड वड्रा यांच्या कंपनीकडून बिकानेरमधील महाजन फिल्ड फायरिंग रेंजमध्ये करण्यात आलेल्या जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करत आहे. लोकसभा निवडणुकीआधी आपली जाणुनबुजून चौकशी केली जात असल्याचा आरोप रॉबर्ट वड्रा यांनी केला असून भाजपाला देशातील जनता याचा संबंध निवडणुकीशी जोडून पाहणार नाही असं वाटत असल्याचं म्हटलं आहे.