राम नाईक वादाच्या भोवऱ्यात; राष्ट्रीय एकात्मतेची थपथ राहिल्याने सूचना

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधी समारंभात राष्ट्रगीत अर्ध्यावर थांबवून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्याचा आदेश दिल्याने वाद निर्माण झाला आहे. मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रगीताची धून वाजवली जात असताना नाईक यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना जनगणमन हे राष्ट्रगीत थांबवण्याची खूण केली व तोंडी सूचनाही दिल्या, कारण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घ्यायची बाकी राहिली होती. नाईक यांच्या सूचनेमुळे राष्ट्रगीत अध्र्यावर थांबवण्यात आले, पण त्यामुळे वाद निर्माण झाला. हा राष्ट्रगीताचा अपमान असल्याचे सांगण्यात आले. राजभवन अधिकाऱ्यांनी लगेच बाजू सावरताना असे स्पष्टीकरण केले, की काहीशा गोंधळातून तसे घडले. राष्ट्रगीताचा अवमान करण्याचा हेतू नव्हता. कार्यक्रम संपला नसतानाच राष्ट्रगीत वाजवण्यात आले व त्यापूर्वी राज्यपाल राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देणार होते. विरोधी पक्ष काँग्रेसने या प्रकरणास जबाबदार असणाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. शिरोमणी अकाली दल पक्षाचे वरिष्ठ नेते बलवंत सिंग रामोवालिया यांनी उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यावर शनिवारी अकाली दल पक्षाला सोडचिठ्ठी दिली. दरम्यान रामोवालिया यांच्या पक्ष सोडण्याने काही फरक पडणार नाही असे अकाली दलाने स्पष्ट केले आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. १२ जणांना समावेश नव्याने करण्यात आला आहे. राज्यातील कामगिरी अधिक सुधारण्यासाठी त्यांनी मंत्रिमंडळात तरुणांना नेतृत्वाची संधी देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.अखिलेश यादव यांनी काही जुने सहकारी मुलायमसिंग यादव यांच्या मित्रांनाही मंत्रिमंडळापासून दूर ठेवताना अरविंद सिंग गोपे, शादाब फातिमा, नितीन आगरवाल, राम सकल गुर्जर आणि यासिर शाह यांना संधी दिली आहे. अल्पसंख्याक समाजाच्या मतपेढीचा विचार करत सहा जणांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी करण्यात आला.