अचानक तुमच्या बँक खात्यात जर काही रक्कम जमा झाली तर तुम्ही नक्कीच खूष व्हाल. मात्र, ही रक्कम जर काही हजारांमध्ये असेल तर तुमच्यासाठी हा आनंद गगनात मावणार नाही. अगदी अशीच स्थिती पश्चिम बंगालमधील काही लोकांच्या बाबतीत घडली आहे. त्यांच्या बँक खात्यात अचानक १० ते २५ हजार रुपये जमा झाले आहेत. ते ही एकदा नव्हे तर दोनदा. ही रक्कम कोणी जमा केली हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, पंतप्रधान मोदींचीच ही कृपा असावी असा दावा काही लाभार्थींनी केला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात हा चमत्कार घडला असून येथील ज्या नागरिकांचे बँक खाती स्टेट बँक, युनायटेड बँक आणि युको बँकेत आहेत. अशा काही जणांच्या खात्यावर एनईएफटीद्वारे ही रक्कम जमा झाली आहे. जिल्ह्यातील केतुग्राम नगरपंचायतीतील शिबलून, बेलून, टलाबाडी, सेनपाडा, अम्बालग्राम, नबग्राम आणि गंगाटीकुरी येथील बँकांमध्ये हा प्रकार घडला आहे. आपल्या खात्यात पैसे जामा झाल्यानंतर ते काढण्यासाठी या ग्रामस्थांनी बँकांच्या बाहेर रांगाही लावल्याचे चित्र आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले होते की, खात्यात पैसे येतील हे कदाचित तेच पैसे असतील, अशी प्रतिक्रिया केतुग्रामचे आमदार शहनवाज शेख यांनी दिली आहे. तसेच ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेत त्यांनीही हे पैसे सरकारनेच आमच्या खात्यात जमा केले असावेत, असा दावा केला आहे. मात्र, हे पैसे नक्की कोण पाठवत आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे या प्रकाराची दखल घेऊन त्याचा तपास केला जात असल्याचे कटवाचे अधिकारी सौमेन पल यांनी म्हटले आहे.