हिंदू धर्माचा विविधतेतील एकतेवर विश्वास आहे. नोबेल पारितोषिकाचे मानकरी रवींद्रनाथ टागोर यांनाही तेच अभिप्रेत होते असे सांगून देशाचे हिंदू राष्ट्रात रूपांतर करण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. मध्यप्रदेशात संघ कार्यकर्त्यांच्या शिबिराच्या समारोपात त्यांनी सांगितले की, टागोरांच्या ‘स्वदेशी समाज’ या पुस्तकात हिंदू राष्ट्राच्या कल्पनेकडे पुन्हा जाण्याचे आवाहन केले आहे.
टागोरांनी ब्रिटिशांवर त्यात टीका केली व हिंदू-मुस्लिम एकमेकांना संपवणार नाहीत  पण त्यातून मार्ग काढून हिंदू राष्ट्र बनवतील असे टागोर यांनी म्हटले होते. हिंदुत्व हे विविधतेत एकतेचा, सुसंवादाचा पुरस्कार करते. एखाद्या देशातील जनतेच्या मनात भीती असेल तर तो देश सुरक्षित नसतो. भारतीय लोकांना अजूनही म्हणजे स्वातंत्र्यानंतरही वेदना जाणवतात. दिल्लीत प्रचंड पैसा खर्च झाला. विकास झालाच नाही असे म्हणणे अन्यायाचे ठरेल पण देशाचा अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही, असा दावा त्यांनी केला.
भागवत म्हणाले की,  इस्रायलने प्रतिकूल स्थितीतही चांगली प्रगती केली, इस्रायल हे वाळवंट होते. त्यांची लोकसंख्या कमी होती पण त्यांनी स्वातंत्र्य मिळवले व विकास वेगाने केला.  इस्रायल जन्माला आला तेव्हा आठ देशांनी त्याच्यावर हल्ला केला. त्या देशाने पाच युद्धे झेलली व भूप्रदेशाचा विस्तार करून मोठय़ा देशाचे स्थान मिळवले. त्या देशाच्या वाटेला कुणी जात नाही कारण चोख प्रत्युत्तर मिळते हे सर्वाना माहिती आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.