सार्वत्रिक टीकेचे लक्ष्य बनलेल्या ‘घरवापसी’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बहुचर्चित अभियानासंदर्भात सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे पार पडलेल्या संघ शिबिरात मौन बाळगले. ‘घरवापसी’वरून होणाऱ्या टीकेच्या पाश्र्वभूमीवर गेल्याच आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरसंघचालकांची भेट घेऊन चर्चा केली होती, हे विशेष!
धर्मातर केलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्याच्या ‘घरवापसी’ अभियानामुळे संघावर टीका झाली होती. विरोधकांनी मोदी सरकारलाही धारेवर धरले होते. या पाश्र्वभूमीवर अहमदाबादमधील संघ शिबिरात भागवत भूमिका मांडतील अशी अटकळ होती. भागवत यांनी या विषयावर मौन बाळगत ‘इतर धर्माचा आदर करण्याची शिकवण हिंदू धर्माने नेहमीच आचरणात आणली’ अशी आठवण यावेळी करून दिली.