देश शोषणमुक्त व स्वाभिमानयुक्त करण्याची आणि संपूर्ण जगाने भारताला अभिवादन करावे अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी केले.
भारताला संपन्न, शोषणमुक्त आणि स्वाभिमानयुक्त करण्याची आमची इच्छा आहे, असे ‘फ्रेंड्स ऑफ ट्रायबल्स सोसायटी’चे सहसंस्थापक दिवंगत मदनलाल अग्रवाल यांच्या जीवनावरील एका पुस्तकाच्या अनावरण समारंभात भागवत यांनी सांगितले. भारतामध्ये असलेली वैशिष्टय़े े पाकिस्तान स्वीकारत नाही. त्यामुळेच फाळणीनंतर त्या देशाने ‘भारत’ या नावावर दावा सांगितला नाही. वेद, देवभाषा संस्कृत, आदिभाषा आणि संस्कृत भाषेचे व्याकरणही सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या भागात निर्माण झाले. परंतु पाकिस्तानने त्यांचे स्वत:चे नाव घेतले आणि ‘भारत’ हे नाव आमच्यासाठी सोडले, असेही भागवत म्हणाले.