सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील कारने दिलेल्या धडकेत सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी हा अपघात झाला. मोहन भागवत राजस्थानहून परतत असताना हा अपघात झाला. जयपूरमधील हरसोली मुंदवार रस्त्यावर हा अपघात झाला. कारने एका दुचाकीला धडक दिली. यावेळी हा मुलगा दुचाकीवर प्रवास करत होता. मोहन भागवत यांच्या कारने ज्या दुचाकीला धडक दिली ती स्थानिक सरपंच चेतराम यादव यांच्या मालकीची आहे. अपघातात चेतराम यादव गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. मात्र अपघतात त्यांचा नातू सचिन याचा मृत्यू झाला. मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय समन्वयक बैठकीसाठी राजस्थानमध्ये गेले होते. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत जवळपास २०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. मे महिन्यात चंद्रपूरमध्ये मोहन भागवत यांच्या ताफ्याचा रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या गाईला वाचवण्याच्या नादात अपघात झाला होता. या अपघातात सीआयएसएफचा एक अधिकारी जखमी झाला होता.