दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) म्हणजे देशद्रोह्यांचा अड्डा असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसवेक संघाच्या ‘पांचजन्य’ या साप्ताहिकातून करण्यात आला आहे. देशाचे विभाजन करणे हे या शक्तींचे उद्दिष्ट असल्याचे साप्ताहिकामधील मुख्य लेखात म्हटले आहे.
२०१० साली छत्तीसगढमधील दंतेवाडा येथे नक्षली हल्ल्यात निमलष्करी दलाचे ७५ जवान मारले गेले होते. त्यावेळी विद्यापीठातील नक्षलसमर्थक संघटनांनी उघडपणे आनंद साजरा करताना नक्षलवाद्यांच्या कृतीचे समर्थन केले होते. विद्यापीठ प्रशासनाच्या नजरेदेखत हे सगळे घडत असताना या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. ‘जेएनयू’मध्ये देशविरोधी कारवायांना नेहमीच पाठबळ देण्यात येत असल्याचा दावाही या लेखातून करण्यात आला आहे. जेएनयू विद्यापीठात राष्ट्रहिताचे विचार मांडणे अथवा तशी कृती करणे हा गंभीर गुन्हा आहे. याशिवाय, भारतीय संस्कृती, जम्मू-काश्मीर अशा स्वरूपाच्या विषयांवर गैरसमज पसरवण्याचे काम ‘जेएनयू’मध्ये सुरू असते, अशा स्वरूपाचे विचार या लेखातून मांडण्यात आले आहेत.