पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. दरम्यान, भूमिपूजनाची तयारीदेखील सुरू करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूमिपूजनाच्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त सरसंघचालक मोहन भागवत, भाजपा नेत्या उमा भारती, अवधेशानंद सरस्वती, साध्वी ऋतंभरा, रामभद्राचार्य, इकबाल अन्सारी, कल्याण सिंह, विनय कटियार यांनादेखील भूमिपूजनासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. आजतकनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आणखी वाचा- लालकृष्ण आडवाणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राम मंदिर भूमिपूजनाला उपस्थित राहणार?

दरम्यान, भूमिपूजनाच्या कार्यक्रमला कोणतेही केंद्रीय मंत्री सहभागी होण्याचं चिन्ह कमी आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह हे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु आता ते येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. तर वयापरत्वे आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हेदेखील अयोध्येत येण्याची शक्यता नसल्याचं सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा- टपाल तिकीटावर दिसणार राम मंदिर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार प्रकाशित

याव्यतिरिक्त कोणत्याही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. तसंच कोणतेही उद्योगपती या कार्यक्रमात सामिल होणार नाहीत. परंतु सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना मात्र या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.

आणखी वाचा- अयोध्या ते अमेरिका… टाइम्स स्वेअरवरील १७ हजार फुटांच्या स्क्रीनवर झळकणार प्रभू रामाची 3D प्रतिमा

चांदीची वीट ठेवून पाया रचणार

२२ किलो ६०० ग्रॅम वजनाची चांदीची वीट ठेवून राम मंदिराचा पाया रचला जाणार आहे. या वीटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावही लिहिण्यात आलं आहे. तसंच जय श्रीराम असंही लिहिण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर या विटेवर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्तही लिहिण्यात आला आहे. एवढंच नाही तर भूमिपूजन करण्यासाठी देशातल्या पवित्र नद्यांचं पाणीही आणलं जाणार आहे. तसंच पवित्र मातीही आणली जाणार आहे. त्यासंबंधीची तयारी सुरु करण्यात आली असल्याचं नवभारत टाईम्सनं दिलेल्या वृत्तात म्हटलं होतं.