राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात जवळजवळ ५००० केंद्रांवर साप्ताहिक शिकवणीद्वारे मुलांना नैतिकता आणि देशभक्ती शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत ‘बालगोकुलम’च्या विस्ताराचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना संस्कृतीचे आणि नैतिकतेचे धडे दिले जाणार आहेत. एक जूनला या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात येणार असून, दर रविवारी मुलांना हिंदू महाकाव्याविषयी शिकविले जाईल. संघाने केरळमध्ये १९७५ साली ‘बालगोकुलम’ची सुरुवात केली होती. राष्ट्रीय संस्कृती आंदोलन म्हणून १९८१ साली याची नोंदणी करण्यात आली.
इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्समधील वृत्तानुसार, संघाच्या केरळ विभागाद्वारे महानगरांमध्ये अनेक शिकवणी वर्ग चालवले जातात. केरळ विभागाला अन्य शहर आणि गावांमध्ये या शिकवणी वर्गांचा विस्तार करण्यास सांगण्यात आले आहे. मुलांसोबत जोडण्यासाठी आणि या कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यासाठी संघ प्रचारक आणि शिक्षक (खास करून इतिहास आणि भाषेचे ज्ञान असलेले) शोधण्यासाठी देखील सांगण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
हे शिकवणी वर्ग प्रचारकांच्या घरी अथवा सामुदायिकरित्या केंद्रावर घेतले जातील. आठवड्यात दोन तास चालणाऱ्या या शिकवणी वर्गात पंरपरागत खेळ, पुराणकथा, भजन, श्लोक आणि सुसंगतीबाबत शिक्षण देण्यात येईल. त्याचबरोबर संस्कृत भाषेच्या वृद्धीसाठीदेखील प्रयत्न करण्यात येतील.