केरळमधील शबरीमला मंदिर परिसराला युद्ध क्षेत्र बनवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न असल्याचा घाणाघाती आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी केला आहे. महिलांच्या मंदिर प्रवेशावरुन गेल्या काही दिवसांपासून शबरीमला मंदिर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.

पिनरायी म्हणाले, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे केरळ सरकार पालन करीत आहे. महिलांना प्रवेशासाठी सरकारने संरक्षणासह सर्वप्रकारच्या सुविधा पुरवल्या आहेत. त्यामुळे सरकार किंवा पोलीस प्रशासन भाविकांना अडवण्याचे प्रयत्न करीत नाही. त्यामुळे इथं कायदा सुव्यवस्था अपयशी ठरल्याचे म्हणता येणार नाही. उलट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शबरीमला मंदिर परिसराला युद्ध क्षेत्र बनवलं आहे.

दरम्यान, आंदोलक येथे येणाऱ्या लोकांची वाहने तपासत आहेत. महिला भाविकांवर तसेच माध्यम प्रतिनिधींवर हल्ले करीत आहेत. केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच या गोष्टी घडत आहेत. माध्यमांप्रती अशा स्वरुपाचा आक्रमक पवित्रा पहिल्यांदाच राज्यात पहायला मिळत आहे, असेही मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी म्हटले आहे.