‘जी-२०’ परिषदेत संस्थात्मक कार्यक्रमात सुधारणा राबवण्याचे आवाहन

भारत,चीन आणि रशिया या देशात बारा वर्षांनंतर येथे त्रिपक्षीय चर्चा झाली असून त्यात बहुदेशीय संस्थांमध्ये सुधारणा कार्यक्रम  राबवण्याचे आवाहन करण्यात आले. संयुक्त राष्ट्रे, जागतिक व्यापार संघटना या संस्थात सुधारणांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. खुली जागतिक अर्थव्यवस्था व  बहुपक्षीय व्यापार प्रणालीचा फायदा आर्थिक वाढ व भरभराटीसाठी व्हायला हवा असेही या वेळी सांगण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग तसेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात शुक्रवारी ही त्रिपक्षीय चर्चा झाली असून बारा वर्षांतील ही दुसरी चर्चा आहे. जी २० देशांच्या शिखर बैठकीच्या पाश्र्वभूमीवर ही चर्चा करण्यात आली असून मोदी यांनी म्हटले आहे की, रशिया,  भारत व चीन यांच्यातील त्रिपक्षीय चर्चा ही उत्तम झाली असून भारताच्या बाजूने मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी अनेक विषयांवर उहापोह झाला. तत्पूर्वी मोदी, अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांच्यातही त्रिपक्षीय चर्चा झाली.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, पुतिन, मोदी व जिनपिंग यांनी आपसातील सहकार्यावर विचार मांडले. दोन्ही देशात संपर्कही वाढवण्यात येणार आहे. ब्रिक्स, एससीओ, एएएएस या संघटनांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रयत्न करून सहकार्य वाढवले जाईल. दहशतवाद, हवामान बदल यासारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्यावर या देशांचे मतैक्य झाले आहे. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले की, अतिशय सकारात्मक अशी ही बैठक होती. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी  ही त्रिपक्षीय चर्चा सुरू केल्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आभार मानले. जागतिक शांतता व भरभराट यात तीनही देशांनी सहकार्य करण्याचे ठरवले आहे. त्यात दहशतवाद, मानवतावादी मदत व इतर क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे, असे गोखले यांनी स्पष्ट केले.