अर्थ क्षेत्रातील अग्रगण्य मानांकन संस्था असलेल्या ‘स्टँडर्ड अॅण्ड पूअर्स’ने (एस अॅण्ड पी) यंदाही भारताच्या मानांकनात कोणतीही सुधारणा केलेली नाही. ‘स्टँडर्ड अॅण्ड पूअर्स’कडून भारताचे BBB- मानांकन कायम ठेवण्यात आले आहे. मात्र येणारा काळ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगला असेल, असे भाकीत मानांकन संस्थेने वर्तवले आहे. ‘स्टँडर्ड अॅण्ड पूअर्स’ने भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दलचा अहवाल आज (शुक्रवारी) प्रसिद्ध केला.

२०१८ ते २०२० या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, असा अंदाज ‘स्टँडर्ड अॅण्ड पूअर्स’कडून वर्तवण्यात आला आहे. भारताकडे असणारी परकीय चलनाची गंगाजळी या काळात वाढेल, असेदेखील संस्थेने अहवालात नमूद केले आहे. गेल्याच आठवड्यात मूडीज या अर्थ क्षेत्रातील नामांकित संस्थेने १३ वर्षांनंतर भारताच्या मानांकनात सुधारणा केली होती. त्यामुळे ‘एस अॅण्ड पी’ संस्थेकडूनही भारताच्या मानांकनात वाढ करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र ‘एस अॅण्ड पी’ने भारताच्या मानांकनात कोणताही बदल केलेला नाही.

‘एस अॅण्ड पी’ने याआधी जानेवारी २००७ मध्ये भारताच्या मानांकनात सुधारणा केली होती. त्यावेळी संस्थेने भारताच्या मानांकनात वाढ करुन ते BBB- केले होते. BBB- गुंतवणूक क्षेत्रातील निच्चांकी मानांकन मानले जाते. त्यावेळी संस्थेने भारतीय अर्थव्यवस्था स्थिर असल्याचे म्हटले होते. यानंतर २००९ मध्ये ‘एस अॅण्ड पी’ने भारतीय अर्थव्यवस्थेला नकारात्मक शेरा दिला. यानंतर पुन्हा २०१० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला स्थिर असा शेरा मिळाला. २०१२ मध्ये पुन्हा भारताला नकारात्मक शेरा देण्यात आला. मात्र या काळात भारताचे मानांकन बदलण्यात आले नाही. भारताचे मानांकन BBB- कायम ठेवण्यात आले.