काही दिवसांपूर्वी कन्सास येथे श्रीनिवास कुचिभोतलाची वर्णद्वेषातून झालेली हत्या ही वैयक्तिक घटना म्हणून पाहण्यात यावी असे वक्तव्य परराष्ट्र सचिव यांनी एस. जयशंकर यांनी केले आहे. श्रीनिवास कुचिभोतलाच्या हत्येला संशयिता-व्यतिरिक्त कुणीही जबाबदार नाही असे त्यांनी म्हटले आहे. या प्रसंगादरम्यान अमेरिका भारताच्या पाठिशी ठामपणे उभी राहिले असे जयशंकर म्हणाले. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनासोबत सचिव यांची बैठक झाली त्या दरम्यान ते बोलत होते. ही हत्या वर्णद्वेषातून झालेली आहे. नौदलातील माजी अधिकाऱ्याव्यतिरिक्त या हत्येला इतर कुणीही जबाबदार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. भारताला अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकन न्यायसंस्था गुन्हेगाराला नक्कीच शिक्षा देईल असे त्यांनी म्हटले आहे. या हत्येनंतर अमेरिकन नागरिकांनी या गोष्टीचा तीव्र निषेध केला आहे. व्हाइट हाउस असो वा महापौरांचे कार्यालय सर्व मोठ्या नेत्यांनी या हत्येचा निषेध केला आहे असे जयशंकर यांनी म्हटले. अमेरिकन नागरिकांनी श्रीनिवासच्या कुटुंबियांचे सांत्वन केले असून त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहायचे असे म्हटले आहे. अमेरिकेच्या लोकांनी या घटनेचा निषेध केला असून त्यांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असे म्हटले आहे. अमेरिकन लोकांचा या प्रकारच्या हिंसेला विरोध आहे असे जयशंकर यांनी म्हटले. ही हत्या वर्णद्वेषातून झाली आहे की नाही याचा तपास फेडरल ब्युरो ऑफ इनवेस्टिगेशन करत आहे. या हत्येनंतर भारतीयांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय वंशांच्या अमेरिकन नागरिकांनी कन्सासचे राज्यपाल सॅम ब्रॉनबॅक यांची भेट घेतली. अमेरिकेत तुम्हाला पूर्ण सुरक्षा मिळेल असे आश्वासन यावेळी ब्रॉनबॅक यांनी दिले. श्रीनिवास कुचिभोतलास श्रद्धांजली देण्यासाठी वॉशिंग्टन कॅंडल मार्च आयोजित करण्यात आला होता. झालेली घटना अतिशय दुःखद असून यापुढे अशा घटना होणार नाही याकडे लक्ष दिले जाईल असे भारतीय वंशाचे रिपब्लिकन नेते पुनीत अहलुवालिया यांनी म्हटले. या दुःखद प्रसंगी अमेरिकेचे सर्व नागरिक भारतीयांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले असे ते म्हणाले. आपला रंग, आपली भाषा, आपला वंश वेगळा असला तरी आपले सर्वांचे रक्त सारखेच आहे असे ते म्हणाले. कन्सासमध्ये एका बारमध्ये आपल्या मित्रासोबत श्रीनिवास कुचिभोतला बसला होता. त्यावेळी नौदलातील माजी अधिकाऱ्याने श्रीनिवासला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आमच्या देशातील चालता हो असे म्हणत त्याने श्रीनिवास आणि त्याच्या मित्रावर गोळ्या चालवल्या. त्या हल्ल्यात श्रीनिवासचा मृत्यू झाला.