माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस.एम कृष्णा यांनी कनार्टक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने केलेल्या उमेदवार निवडीवर टीका केली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत मतभेद ऐन निवडणुकीत चव्हाटय़ावर आले आहेत.
बंगलोर येथे वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, १९७२ पासून आपण उमेदवार निवड प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला आहे, त्याकाळात निवड समितीत १५-१६ सदस्य असायचे त्यांच्यात गांभीर्याने चर्चा व्हायच्या व त्यानंतर उमेदवाराची निवड केली जात असे. आताच्या निवड समितीत माझ्यासह ६० सदस्य आहेत, ही निवड समिती अवजड आहे. साठ नावे पाहून मला आश्चर्य वाटले. अशा मोठय़ा निवड समितीच्या मदतीने उमेदवार कसे निश्चित करणार, त्यामुळे मी निवड समितीच्या बैठकीस गेलो नाही.
१९९९-२००४ या काळात तुम्ही मुख्यमंत्री असताना जी कामगिरी केलीत त्याचा फायदा घेण्यात काँग्रेस अपयशी ठरली असे वाटते काय असे विचारले असता ते म्हणाले की, तत्कालीन नेत्यांनी केलेल्या कामाचा फायदा उठवणे हे राजकीय शहाणपण आहे पण त्याची गरज नाही असे ज्यांना वाटते त्यांचेच त्यात नुकसान आहे. ज्यांनी हे चांगले काम केले त्यांचा त्यात काहीच तोटा नाही.
कुठला पक्ष सत्तेवर येईल याबाबत काही भाकित करण्यास त्यांनी नकार दिला. जनमत चाचण्या फसतात. लोक कुणाला मत देणार हे गुपित कधीच सांगत नसतात त्यामुळे लोकांचा कल समजणे अवघड असते, असे ते म्हणाले.
१९९९ मध्ये काँग्रेसने घवघवीत यश मिळवले त्यावेळी राज्याचे प्रभारी असलेले गुलाम नबी आझाद पाठदुखी असूनही संपूर्ण प्रचारात सहभागी होते, त्यांच्यासारख्या प्रेरणा देणाऱ्या घटकांची गरज आहे, जे सर्वाना एकत्र करून पुढे नेतील, असे त्यांनी सांगितले.
सध्याच्या राजकारणामुळे आपण व्यथित आहात का असे विचारता ते म्हणाले की, राजकारण कधीच व्यथित करीत नाही. जनरल डग्लस मॅकआर्थरच्या शब्दांत सांगायचे तर जुने सैनिक कधीच मरत नसतात ते केवळ निष्प्रभ ठरत जातात.