‘सब का साथ, सब का विकास’ ही केंद्र सरकारची घोषणा खोटी असल्याची टीका सपाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी केली आहे. सरकारचे विकासाचे सूत्र केवळ बडय़ा उद्योगपतींसाठी आहे, सर्वसामान्यांसाठी नाही, असेही मुलायमसिंह म्हणाले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या चर्चेत भाग घेताना मुलायमसिंह बोलत होते. आपल्या नातवाच्या विवाहपूर्व समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिल्याचे या वेळी मुलायमसिंह यांनी समर्थन केले. पंतप्रधान हे भाजपचे नाहीत, तर देशाचे आहेत, असे ते म्हणाले.
आपल्या गावातील नागरिकांसह अनेकांनी मोदी यांना निमंत्रण दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. आपण मोदी यांना सैफई येथे येण्याचे आमंत्रण ते देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून दिले, असे यादव म्हणाले.
‘सब का साथ, सब का विकास’ ही घोषणा खोटी आहे. अध्यादेशाद्वारे आपण केवळ उद्योगपतींसाठीच पायघडय़ा घातल्या नाही का? सर्वसामान्य जनता किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी काही केले आहे का, असा सवाल मुलायमसिंह यांनी केला.