महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, नंदूरबारबरोबरच कर्नाटक, गुजरात, केरळ, उत्तराखंड आणि काश्मीरच्या काही भागांमध्ये पुराने थैमान घातलं आहे. यापैकी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि केरळमध्ये मागील काही दिवसांमध्ये पुरामुळे एकूण २२५ जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर पुरग्रस्तांच्या मदतीला धावून आला आहे. सचिनने ट्विट करुन पुरपरिस्थितीबद्दल माहिती देत पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

“भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. आता पाण्याची पातळी कमी झाल्याने परिस्थितीमध्ये आधीपेक्षा सुधारणा आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीच्या माध्यमातून या पूरग्रस्तांना मी मदत केली आहे. तुम्हीही पूरग्रस्तांना मदत करा आणि पाठिंबा द्या,” असं ट्विट सचिनने केलं आहे. या ट्विटबरोबर त्याने पुराचे काही फोटोही पोस्ट केले आहेत.

दरम्यान, कालच महानायक अमिताभ बच्चन यांनी अनेक कलाकार गाजावाज न करता पूरग्रस्तांना मदत करत असल्याचे म्हटलं आहे. “देशात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीतील पीडितांना अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी पुढे येऊन मदत करीत आहेत. मात्र, ते या गोष्टी बोलून दाखवत नाहीत. त्याचबरोबर मलाही स्वतःला कोणालाही कळू न देता कोणत्याही धर्मादाय संस्थेला मदत करायला आवडेल”, असं मत बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीच्या नव्या ११ सिझनच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.