पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या निमित्ताने राम मंदिर निर्माणासाठी आतापर्यंत केलेली आंदोलने, संघर्ष यांचा माध्यमांकडून आढावा घेतला जात आहे. २००२ साली गुजरातच्या गोध्रा रेल्वे स्थानकात साबरतमी एक्स्प्रेसला लावण्यात आलेली आग आणि त्यानंतर संपूर्ण गुजरामध्ये उसळलेल्या दंगलीच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत.

आणखी वाचा- कार सेवा म्हणजे काय? नक्की काय केलं देशभरातल्या कारसेवकांनी?

गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील सोजित्रा तालुक्यातील रुन गावातील एकूण २४ जण कारसेवक म्हणून अयोध्येमध्ये गेले होते. या २४ जणांमध्ये १८ महिला होत्या. २७ फेब्रुवारीला गोध्रा रेल्वे स्थानकातील साबरमती एक्स्प्रेसच्या S-6 डब्ब्याला लावण्यात आलेल्या आगामीध्ये १८ पैकी सहा महिलांचा होरपळून मृत्यू झाला. गोध्रा रेल्वे स्थानकात ट्रेनला आग लावण्याच्या या घटनेमध्ये ५९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. यात बहुतांश कारसेवक होते. या घटनेमुळे संपूर्ण गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींमध्ये १२०० नागरिकांचा मृत्यू झाला. यात बहुतांश मुस्लिम होते.

आणखी वाचा- राम मंदिराचा मुद्दा ते केंद्रात सत्ता, जाणून घ्या भाजपाचा प्रवास

“आज कोणाच्याही मनात द्वेषाची भावना नाहीय. आम्ही ते प्रभू रामचंद्रांसाठी बलिदान मानतो. राम मंदिराच्या निर्माणाने मला खूप आनंद झाला आहे. करोना व्हायरसचा आजार नसता तर अधिक जास्त आनंद झाला असता” असे कारसेवक म्हणून अयोध्येत गेलेल्या जयंतीभाई यांच्या काकी म्हणाल्या. S-6 डब्ब्याला आग लावली, त्यावेळी जयंतीभाई यांच्या काकी साबरमती एक्स्प्रेसमध्ये होत्या. भूमिपूजनाचा दिवस खास असल्याने त्या आज दिप प्रज्वलित करणार आहेत. जयंतीभाई यांची आई सुद्धा कारसेवक म्हणून अयोध्येत गेली होती. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- अयोध्या-बाबरी वादामुळे कशी पेटली मुंबई?

बुधवारी भूमिपूजनाच्यावेळी अयोध्येत उपस्थित राहता येणार नाहीय, त्याबद्दल ५८ वर्षीय जयंतीभाई यांना कुठलीही खंत नाहीय. ‘करोना व्हायरस नसता तरी इतक्या सर्व लोकांची अयोध्येमध्ये व्यवस्था करणे सोपे नव्हते’ असे ते सांगतात.
“एकदा का, करोनाचे संकट संपले की, मी माझ्या दोन मुलांसोबत अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहे”, असे नवीनचंद्र ब्रह्मभट्ट (६५) यांनी सांगितले. ते मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर येथे राहतात. अयोध्येवरुन कारसेवा करुन परतत असताना साबरमती एक्स्प्रेसला लावलेल्या आगीमध्ये नवीनचंद्र ब्रह्मभट्ट यांच्या पत्नी नीरुबेन यांचा मृत्यू झाला होता.