भारतात असहिष्णुता पसरली असल्याचे वक्तव्य करून अभिनेते आमिर खान आणि शाहरूख खान त्याचप्रमाणे सपाचे नेते आझम खान हे देशाची प्रतिमा मलिन करीत आहेत आणि त्याला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची फूस असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी केला आहे.
आमिर खान, शाहरूख खान आणि आझम खान हे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह देशाची प्रतिमा मलिन करीत आहेत, असा आरोपही साध्वी प्राची यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केला. देशातील असहिष्णुतेबाबत सध्या जो प्रचार सुरू आहे ते देशाचे नाव खराब करण्यासाठी रचण्यात आलेले कारस्थान आहे. काही देशद्रोहींनी हे कारस्थान रचले असून त्यांना त्याबाबत मोबदला मिळत आहे, असा आरोपही साध्वी प्राची यांनी केला. दादरीकांडाचा संदर्भ देताना त्या म्हणाल्या, हिंदूंनी कधीही कोठेही दंगलीची सुरुवात केली नाही, मात्र काही जण गोमांस भक्षण करून दंगली पेटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.