राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्येप्रकरणी तब्बल नऊ वर्षांनंतर साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. भोपाळच्या देवास न्यायालयाने बुधवारी यासंदर्भातील निकाल दिला. देवासच्या चुना खदान परिसरात २९ डिसेंबर २००७ रोजी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून जोशी यांची हत्या केली होती. २०११ मध्ये  या हत्याप्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर एनआयएने तब्बल तीन वर्षांनी विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. सप्टेंबर २०१४ मध्ये या खटल्याची सुनावणी देवास न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानंतर २०१५ मध्ये सत्र न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंग आणि अन्य सात जणांवर आरोप दाखल केले होते. सुनील जोशी हे साध्वी प्रज्ञासिंग यांच्याप्रमाणेच मालेगाव, समझौता एक्स्प्रेस आणि अजमेर बॉम्बस्फोट प्रकरणांतील आरोपी होते.

साध्वी प्रज्ञासिंग यांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप मध्य प्रदेश पोलिसांनी केला होता. मात्र एनआयएने हा आरोप खोडून काढला होता. समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातील सहआरोपी लोकेश शर्मा आणि राजेंदर पेहलवान यांनीच सुनील जोशी यांची हत्या केली आहे, असे एनआयएने सांगितले. समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी नुकतेच महू येथून भाजपचे युवा नेते असलेल्या दिलीप जगताप आणि जितेंदर शर्मा यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून ही हत्या शर्मा व पेहलवान यांनी केल्याचे सिद्ध झाले होते.