दिल्ली पोलिसांनी छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटू सागर धनकर हत्या प्रकरणात सुशील कुमारच्या विरोधात १ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी स्टेडियमचा दरवाजा आतून बंद केला आणि सागर धनकर आणि इतरांना ३०-४० मिनिटे बॅट, हॉकी स्टिक आणि बेसबॉल बॅटने मारहाण केली. खुनाच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आली आहे.

सुशील कुमार आणि इतरांनी ४ आणि ५ मेच्या मध्यरात्री मालमत्तेच्या वादातून धनकर आणि त्याच्या चार मित्रांवर स्टेडियममध्ये हल्ला केला होता. त्यानंतर सागरचा मृत्यू झाला होता. पोलीस तपासात उघड झाले की, सागर आणि त्याच्या मित्रांना दिल्लीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून अपहरण करून स्टेडियममध्ये आणण्यात आले होते, त्यानंतर गेटला आतून कुलूप लावण्यात आले आणि सुरक्षा रक्षकांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले.

आरोपींनी बंदुका देखील आणल्या होत्या

१००० पानांच्या आरोपपत्रात पोलिसांनी सांगितले, “स्टेडियममध्ये, सर्व पीडितांना घेरण्यात आले आणि सर्व आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. सर्व पीडितांना सुमारे ३० ते ४०  मिनिटे लाठी, हॉकी, बेसबॉल बॅट इत्यादींनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने असेही उघड केले की काही आरोपींनी तेथे बंदुका आणल्या होत्या आणि पीडितांना धमकी दिली होती.

आरोपींनी पोलिसांचे सायरन ऐकताच…

दरम्यान, एक पीडित घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्याने पोलिसांना फोन केला. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि पीसीआर व्हॅनचे कर्मचारी स्टेडियममध्ये पोहोचले. तपासात उघड झाले, आरोपींनी पोलिसांचे सायरन ऐकताच ते मृत सागर आणि जखमी सोनूला स्टेडियमच्या भूमिगत ठिकाणी घेऊन गेले. आरोपींनी दोन्ही पीडितांना जखमी अवस्थेत तिथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. पोस्टमार्टम अहवालानुसार, सागर धनकरच्या मृत्यूचे कारण धारधार वस्तूच्या हल्ल्यामुळे मेंदूला झालेली इजा होती. सुशिल कुमार आणि त्याच्या साथीदारांकडून पाच वाहने जप्त करण्यात आली. वाहनाच्या मागच्या सीटवरून एक डबल बॅरल गन आणि पाच जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली.