गुंतवणूकदारांचे पैसे बुडवणाऱ्या सुब्रतो रॉय यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. तुम्हाला आधीपासूनच पुरेसा वेळ देण्यात आला होता. दिलेल्या कालावधीत पैसे भरले नाही तर अॅम्बी व्हॅली प्रकल्पाचा लिलाव केला जाईल असे खडसावून सांगत सुप्रीम कोर्टाने सुब्रतो रॉय यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.

सहारा समुहाने १३ एप्रिलपर्यंत सेबीकडे ५,०९२ कोटी रुपये जमा करावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने आणखी वेळ द्यावा अशी विनंती सहारा समुहाने सुप्रीम कोर्टाकडे केली होती. गुरुवारी या याचिकेवर सुनावणी झाली. सहारा समुहाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. आता पैसे भरण्यासाठी दिलेल्या कालावधीत आणखी वाढ करणार नाही असे कोर्टाने स्पष्ट केले.

महिनाभरापूर्वी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत सहारा समुहाने लिलावासाठी १५ मालमत्तांची यादी दिली होती. यातील १३ मालमत्ता विकून पाच हजार कोची रुपये मिळू शकतील असे सहाराचे म्हणणे होते. पैसे जमा न केल्यास सहारा समुहाच्या लोणावळा येतील अॅम्बी व्हॅलीचा लिलाव होण्याची शक्यता आहे.

समभागधारकांचे २४,००० कोटी रुपये परत करावे यासाठी सेबीने न्यायालयामध्ये सुब्रतो रॉयविरोधात धाव घेतली होती. मार्च २०१४ मध्ये पहिल्यांदाच सुब्रतो रॉयला अटक करण्यात आली होती. छोट्या गुंतवणूकदारांना खोटे बाँड विकून रॉय यांनी हजारो कोटी रुपये कमवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. गुंतवणूकदारांची रक्कम सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकाच्या खात्यामध्ये जमा करण्याऐवजी सेबी-सहाराच्या खात्यात ती जमा करावी, असा आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले होते.