१९८४ च्या दंगल प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेला काँग्रेस नेता सज्जन कुमार हा आत्मसमर्पणसाठी १ महिन्याची मुदत मागणार आहे. त्यासाठी त्याने दिल्ली हायकोर्टात अर्ज केला आहे. मात्र या अर्जाला आम्ही विरोध करणार आहोत अशी प्रतिक्रिया वकील एच. एस. फुलका यांनी दिली आहे. १९८४ च्या शीख दंगल प्रकरणात सज्जन कुमारला न्यायालयाने दोषी ठरवले. त्यानंतर सज्जन कुमारने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे.

कोण आहे सज्जन कुमार?
सज्जन कुमार काँग्रेस पक्षात ३० वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत आहे. १९७० च्या दशकात सज्जन कुमार हे काँग्रेस नेते संजय गांधी यांच्या संपर्कात आले. त्यामुळे ते राजकारणात सक्रिय होतील हे नक्कीच होते. दिल्लीतील मादीपूर भागात त्यांनी नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि १९७७ मध्ये नगरसेवक झाले. इथूनच त्याची सक्रिय राजकारणाची सुरुवात झाली. १४ व्या लोकसभेसाठी सज्जनकुमार खासदार म्हणून निवडून आला. १९८० मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून अवघ्या ३५ व्या वर्षी सज्जन कुमारला खासदार होता आहे.

२००४ मध्ये सज्जन कुमारच्या नावावर दोन रेकॉर्ड आहेत. त्यातले पहिले आहे की लोकसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक मतं मिळवणारा तो उमेदवार ठरला. तर दुसरा रेकॉर्ड आहे तो म्हणजे दिल्लीत सर्वाधिक मतं त्याच्या नावावर आहेत.१९७७ ते १९८० या काळात त्याच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख उंचावतच गेला.

सज्जन कुमार हा असा काँग्रेस नेता आहे जो नगरसेवक असताना त्याला थेट खासदारकीचे तिकीट मिळाले. त्या संधीचे त्याने सोने केले, १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर ज्या दंगली उसळल्या त्याचा फटका सज्जन कुमारलाही बसला. शीख मतं मिळावीत म्हणून सज्जन कुमारला १९८९ मध्ये त्याला तिकिटही दिलं गेलं नाही. १९९३मध्ये सज्जन कुमारला दिल्ली विधानसभेचे तिकिट देण्यात आले. त्यात निवडूनही आला. मात्र १९९६ मध्ये भाजपाचे नेते कृष्णलाल शर्मा यांनी सज्जन कुमारला हरवले.

आत्तापर्यंत दिल्लीच्या विविध कोर्टांमध्ये सज्जन कुमारच्या विरोधात अनेक खटले दाखल झाले आहेत. सीबीआयनेही सज्जन कुमार विरोधात आरोप पत्र दाखल केले आहे. १९९८ आणि १९९९ या दोन्ही वर्षात त्याला खासदारकीचे तिकिट दिले गेले नाही. आता शीख दंगली प्रकरणी कोर्टाने सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.