उत्तरप्रदेशमध्ये गेल्यावर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसमधील काही नेत्यांनी समाजवादी पक्षासाठी काम केल्यामुळेच तिथे कॉंग्रेसचा पराभव झाला, असा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी केलाय. राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीसाठी मोठी मेहनत घेतली, तरी समाजवादी पक्षाला मदत करणाऱया कॉंग्रेसच्या नेत्यांमुळेच पक्षाला पराभव पत्करावा लागला, असे त्यांनी म्हटले आहे.
निवडणुकीच्या काळात कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी समाजवादी पक्षाला आर्थिक मदत केल्याचा आरोपही वर्मा यांनी केला. ते म्हणाले, कॉंग्रेसमधील काही नेत्यांनी पक्षाकडून निधी घेतला आणि तो समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला दिला. जेणेकरून विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होईल. कॉंग्रेसमधील काही नेत्यांचा गट हा पूर्णपणे समाजवादी पक्षासाठीच काम करीत होता.
आपला मुलगा राकेश वर्मा याला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांनी समाजवादी पक्षाला पाच कोटी रुपये दिल्याचा आरोपही वर्मा यांनी केला. राकेश वर्मा हे बाराबंकी जिल्ह्यातील दर्याबाद मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते.